Wednesday, August 10, 2016

फक्त तुम्ही खचुन जावु नका.


शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट
परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या
पोरांची.
ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण
अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत
नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच
काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग
वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC
किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
.
.
आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश
पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले
नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती
मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc
झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन
शिकवतात. त्यांच्यापेक्षा जास्त हाल
इंजीनियरिंग झालेल्या पोरांचे होतात. बापानी
घरी पार ओढताण करुन,तेवढी कमाई पण नसताना
लाखो खर्च करुन पोराची इंजीनियरिंग पूर्ण केलेली
असते आणि हे कंपनीवाले काष्टीच्या बाजारात
शेळ्या विकल्याप्रमाणे आठ-दहा हजार द्यायलापण
नाक मुरडतात.
.
.
ह्या वयात जेवढि मनाची घालमेल होत असेलना
तेवढी कधीच होत नाय. शिक्षण पूर्ण करून नोकरी
नाय. घरी बापाला पैशे सुद्धा मागायची लाज
वाटते. हे कमी म्हणून गावातले अडानी त्याला
विचारणार,"व्हंय रं अजुन किती राह्यलेय तुझं
शिक्षण?तुला नोकरी कधी लागणार?आयला तू तर
साहेब व्हणार ब्वा." किती डोकं फिरत असेल अशे
टोमणे मारल्यावर?आणि त्याच्यातुन जर असा
दुष्काळ पडला तर विचारुच नका.
.
.
दहावी-बारावी बळचं काठावर पास झालेला
एखादा आर्मीत भरती झालेला कुणी सुट्टीला
आल्यावर त्याला ही पोरं म्हणतात,"मजा आहे ब्वा
तुमची"काळीज तुटंत ही अगतिकता बघुन.
शिकलेल्या पोरींचे तरी बर आहे नोकरीचे नाय जमलं
कुठ तरी निदान लग्न तरी लावता येतं पण शिकलेली
पोरं काय करणार?
.
.
कुठंच काय नाय जमलं तर मोबाइल शॉपी काढ,कसले
पॉलिसी एजेंट हो,MIDCमध्ये कामाला
जा,एखांद्याच्या हाताखाली कामाला जा
किंवा तसलेच काही सटर फटर उद्योग करावे
लागत्यात ह्या सुशिक्षित पोरांना.'आई जेवु
घालीना आणि बाप भिक मागु देईना' पार अशी
अवस्था होते त्यांची.
.
.
मला वाटते मानसिक पाठबळाची सगळ्यात जास्त
गरज ह्याच वयात असते. त्यांना पालकांनी नक्कीच
समजुन घेतले पाहिजे. सगळं काही ठीक होईल असा
विश्वास त्यांना दिला पाहिजे. बाकी
पोरांनीपण सरकारला,मंदीला,दुष्काळाला शिव्या
देण्यापेक्षा ह्यातून कसा उपाय निघेल हे बघितले
पाहिजे. एक ध्यानात ठेवा सगळं ठीक होईल पण
फक्त तुम्ही खचुन जावु नका.
---

No comments:

Post a Comment